वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली.
अध्याय सहावा
शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः । नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥11॥
तरी विशेषें आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें ॥163॥ जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें ॥164॥ जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥165॥ अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरी । ऐसीं रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥166॥ जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥167॥ स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥168॥ ऐसे न राहातयातें रहावी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥169॥ हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें शृंगारियांहि उपजे । देखतखेवों ॥170॥ जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अति चोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥171॥ आणिकही एक पाहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । मैळेचिना ॥172॥
हेही वाचा – Dnyaneshwari : जी तुम्ही चित्त देयाल, तरी ब्रह्म मिया होईजेल…
अर्थ
शुद्धस्थानी, अति उंच नाही, अति सखल नाही, असे दर्भावर (मृगादिकांचे) चर्म आणि त्यावर वस्त्र ठेवलेले, असे आपले स्थिर आसन स्थापन करून, ॥11॥
तर आताच सविस्तर प्रतिपादन केले जाईल. परंतु त्याप्रमाणे अनुष्ठान करून अनुभव घेतला तरच त्याचा उपयोग होईल. त्याकरिता या अभ्यासाला योग्य असे ठिकाण पाहाणे जरूर आहे. ॥163॥ ज्या ठिकाणी सहज बसले असता, असे समाधान प्राप्त होते की, तेथून उठावे असे वाटत नाही आणि जे पाहिल्याबरोबर वैराग्यास दुप्पट जोर येतो. ॥164॥ जेथे संतांनी वास्तव्य केले आहे आणि ज्या ठिकाणी समाधानाला सहाय्य मिळून मनाला धैर्याचा उल्हास येतो ॥165॥ (जेथे) अभ्यासच आपण आपल्याला साधकांकडून करवून घेतो आणि अनुभव आपण होऊन साधकाच्या अंत:काणाला माळ घालतो; याप्रमाणे जेथे रम्यपणाचे माहात्म्य निरंतर आहे. ॥166॥ अर्जुना, ज्या स्थानावरून सहजगत्या गेले असता नास्तिकाला देखील तपश्चर्या करावी, अशी मनापासून आस्था वाटते. ॥167॥ सहज वाटेने येत असता जर कोणी अकस्मात त्या ठिकाणी आला आणि तो जरी विषयासक्त असला, तरीही तो परत माघारी जाण्याचे विसरतो. ॥168॥ याप्रमाणे जे स्थान न राहणार्याला राहावयास लावते आणि भटकणार्याला एके ठिकाणी बसवते तसेच वैराग्याला थापटी मारून जागे करते ॥169॥ जे स्थान पाहिल्याबरोबर एखाद्या विलासी पुरुषाला सुद्धा असे वाटावे की, या स्थानावरून राज्य ओवाळून टाकावे आणि येथेच स्वस्थपणे राहावे. ॥170॥ जे स्थान इतके सुंदर आणि तसेच अतिशय पवित्र असून जेथे डोळ्याला ब्रह्म स्पष्ट दिसते ॥171॥ आणखीही एक या स्थानाचे लक्षण पाहावे, ते हे की, ज्या स्थानी साधकांनी वस्ती केलेली असावी आणि जे स्थान लोकांच्या येण्याजाण्याने वहिवाटलेले नसावे. ॥172॥
क्रमश:
हेही वाचा – Dnyaneshwari : चालतां पाऊल जेथ पडे, तेथ अपवर्गाची खाणी उघडे…


