‘बापलेकी’ (संपादन – पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर, विद्या विद्वांस) हे पुस्तक प्रसिद्ध वडील आणि त्यांच्या मुली (प्रसिद्ध अप्रसिद्ध) यांनी लिहिलेल्या लेखांचं संकलन आहे. सुरुवातीचा भाग लेकींनी वडिलांवर लिहिलेल्या लेखांचा, मधला भाग वडिलांनी मुलींबद्दल लिहिलेल्या लेखांचा आणि शेवटी संकलक लेखिकांचे आकलन, मानसोपचार तज्ज्ञांचे मत असे तीन भाग आहेत.
बापलेक म्हटल्यावर ‘गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या?’ ही कवी बींची कविता आठवते आणि संदीप खरेंची दमलेल्या बापाची कहाणी सुद्धा! बापलेकीचे नाते काही वर्षांपूर्वी फारसे विचारात घेतले गेलेले नसल्याने हा विषय औत्सुक्यपूर्ण, अनोखा होता त्यात विजय तेंडुलकर – प्रिया तेंडुलकर, विद्याधर पुंडलिक – मोनिका गजेंद्रगडकर, वसंत गोवारीकर, अनंत अंतरकर, गौरी देशपांडे, जाई निंबकर, अरुणा ढेरे, प्रतिभा रानडे वगैरे मोठ्या लेखक, लेखिकांचे लेख असल्याने कुतूहल अधिकच वाढले. तिन्ही संकलक लेखिकांनी परिश्रम घेऊन संकलन केल्याचे जाणवत राहाते. इतक्या महत्त्वाच्या विषयावर पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे आभार.
सुरुवातीला मुलींनी वडिलांवर लिहिलेले लेख प्रामाणिक आहेतच, पण संयत सुद्धा आहेत. वडिलांचं कौतुक, प्रेम, आदर आहेच; पण त्यांचे बोचलेले दोष सुद्धा लिहिले आहेत. ’सगळं अगदी खरंखरं लिहिलं आहे,’ या वाक्याला अजिबात अर्थ नसतो, तसे असू शकत नाही; पण बरेचसे सत्याला जवळ जाणारे विश्वासार्ह वाटावे, असे लेखन आहे. अगदी एखाद-दोन लेखांत व्यक्तिपूजा केल्यासारखी वाटते, पण बाकी लेखिकांनी वडिलांना माणूस म्हणूनच पाहिले, जोखले आहे. त्यांच्या गुणदोषांसकट त्यांच्यावर प्रेम केले आहे. पिता असल्याने साहजिकच झुकते माप मिळतेच, पण दोषांवर अवाजवी पांघरूण घालण्याचा प्रयत्न दिसत नाही किंवा वकीलपत्र घेतल्यासारखे समर्थन केल्याचा आवसुद्धा नाही.
हेही वाचा – Bookshelf : ‘मास्तरांची सावली’… एक विलक्षण प्रेमकहाणी
मोनिका गजेंद्रगडकर लिहितात की, त्या पुंडलिकांची अतिशय लाडाची ‘चिऊ’ होत्या, पण आशूची (अश्विन, दिवंगत भाऊ) जागा घेऊ शकल्या नाहीत. पुढे हेही म्हणतात की, त्यांच्या वडिलांनीच त्यांना सर्वात जास्त ओळखले. पद्मजा फाटकांनी नेहमीच प्रसन्न लिहिलं आहे, सकारात्मक लिहिलं आहे. इथे वडिलांबद्दल लिहिताना इतकं जास्त खुसखुशीत लिहिण्याचा मोह टाळायला हवा होता. स्मिता भागवतांचं लेखन वाचून हृदयात कालवाकालव होते तरी, त्यांचं लेखनही संतुलित आहे. वडिलांचे वागणे रुचणारे नसले, त्रासदायक असले तरी त्यांनी भावनांचं प्रदर्शन मांडलेलं नाही. “आता मी मरणार आहे का?” असे गौरी देशपांडेच्या “दिनूने” (वडिलांना त्या दिनू म्हणत) त्यांना विचारल्यावर त्या ‘हो’ म्हणाल्या, तेव्हा ते म्हणाले, ‘बराय तर मग!’ मृत्यूला सहज सामोरे जाणारे वडील…
गुंडाला न घाबरता एक सणसणीत ठेवून देणारे वसंत गोवारीकर. हे एक वेगळे रूप. वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर जगताना आलेले अनुभव लेखिका कळवळून सांगते. त्यांच्या अशा वागण्यामुळे दुखावली गेलेली असतानाही शेवटी म्हणते की, तरीही त्यांच्याबद्दल मनात प्रेम आहे. लेखिका सध्याच्या काळातली असती तर, शेवटी असे म्हणाली नसती. प्रसिद्ध लेखकाची मुलगी असूनही वडिलांनी लेखनात किंवा घडण्यात काहीच मदत केली नाही, अशी खंत एक लेक व्यक्त करते.
सई परांजपे पित्याला पहिल्यांदाच भेटणार असतानाचा प्रसंग सांगताना शेवटपर्यंत आपली उत्सुकता ताणून ठेवतात. अरुणा ढेरें म्हणतात, अण्णांच्या पेक्षा माझ्या वाट्याला लिहिण्यातलं दुख कदाचित पुष्कळ कमी आलं असेल, पण लिहिण्यात त्यांना मिळालेला परतत्वस्पर्शी आनंदही माझ्या वाट्याला आला नाही. रजिया पटेलांना आंतरधर्मीय विवाहात वडिलांचा मिळालेला भक्कम आधार, त्यांनी स्वत:च्या वागण्यातून सामाजिक बांधिलकीचे दिलेले धडे अमूल्य वाटतात…
वडिलांनी मुलींबद्दल लिहिलेल्या लेखांत विविधता आहे. प्रियासारखी प्रसिद्ध लेक ते नंदिता सारखी दिव्यांग लेक… सर्वाना सामील करून घेतले आहे. वसतीगृहात पाठवलेली लेक सुद्धा आहे. वडिलांना प्रेम व्यक्त करता येत नाही, पण ते खोलवर रुतलेलं असतंच! त्यांचं मुलींवर बारीक लक्ष असतं, ते प्रेमापोटी. त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याने पिता कासावीस होतो आणि यशाने फुलून जातो. कवी बी म्हणतात,
प्राण ज्यांचेवर गुंतले सदाचे
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे
तदा बापाचे हृदय कसे होते
न ये वदता अनुभवी जाणती ते
पित्यांना लिहितं केल्यामुळे ही सुखद अनुभूती झाली. वडिलांनी मुलींना फारच झुकतं माप दिलंय, कौतुक केलंय. काहींना अवाजवी वाटू शकेल, पण मला मात्र ते खोटं वाटत नाही; कारण त्यांना त्यांची मुलगी तशीच दिसते आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांनी प्रामाणिकपणेच लिहिले आहे. मुकुंद टाकसाळे ‘शिंग फुटलेली राजकन्या’ लेखात म्हणतात की, नेहाला कितीही रागावलं तरी ती पुन्हा हसून बोलायला लागते. इतकं निर्मळ मन कसं आहे? अनंत अन्तरकर तर मुलीला दुसरी आईच म्हणतात!
समालोचनातला ‘नकुशा – काल, आज आणि उद्या’ लेख स्त्रीच्या इतिहासावर आहे. प्राचीन भारतातली स्त्रियांची स्थिती त्यांनी लिहिली आहे, ज्यातून प्राचीन भारतीय स्त्रीची प्रतिमा त्यांनी उभी केली आहे. परंतु ती सर्वार्थाने योग्य नाही. त्यातला काही भाग पटला नाही. तथ्यांना धरून नाही. आर्य, नियोग, दुराचारी पती याबद्दल मांडलेली मते पूर्वग्रहदूषित आहेत, असे वाटले. हे एक गालबोट या पुस्तकाला लागले आहे, याचे वैषम्य वाटते.
मुलींच्या समस्या गोष्टीरूपाने लिहिल्या आहेत, असेही वडील समाजात आहेतच. त्यांची संख्या जास्त असू शकते, हे वास्तव आहे. पुढचा मागचा विचार न करता मुलीला ‘उजवून’ टाकणारे, मुलीने वडिलांचा संसार करावा, असे म्हणणारे आणि तिचे सर्वार्थाने शोषण करणारे आहेतच; किंबहुना राहतीलच. गालव आख्यानातली माधवी आजही कुठे न कुठे अस्तित्वात आहेच… ‘रीटा वेलिणकर’ आहे… पित्याच्या लाडाने बिघडलेली देवयानीसुद्धा आहे. ‘तो मी नव्हेच’वर प्रतिक्रिया देताना प्र. के. अत्रे म्हणाले होते की, अशा घटनांतून आपला समाज किती उथळ आहे, हे दिसून येते. पिता स्वत:च्या मुलीकडे विकृत दृष्टीने पाहू लागल्यावर झालेले किळसवाणे कुरूप रूप पुढच्या मानसोपचार तज्ज्ञाने लिहिलेल्या लेखात आहे. हे ओंगळ, गलिच्छ वास्तव वाचवत नाही.
बापलेकीचे नाते मात्र आता बदललेले दिसते. एकच मुलगी असलेली, मुलगीच हवी, असे म्हणणारी बरीच कुटुंबं आहेत. मुलगा, मुलगी असा भेद मानणे कमी झाले आहे. हळूहळू अजून बदल होतील, हे निश्चित .मुलगा वंशाचा दिवा वगैरे समजणारे (स्वतःला चंद्रगुप्त मौर्य समजून वंश पुढे चालू ठेवण्याचा निश्चय करणारे!) कमी होत आहेत. बाप आता मुलीवरच प्रेम, ममता (प्रिया म्हणते तसं बपता) दाखवतात. ‘मेरी बेटी मेरा अभिमान’ आहेच. मध्यंतरीने एका प्रसिद्ध व्याख्यातीने म्हटले होते की, एवढ्या मोठ्या मुली आपल्या वडिलांना मिठ्या कशा काय मारतात? त्यावर प्रतिक्रियांचा कल्लोळ झाला होता. मुली सरसावून पुढे आल्या होत्या आणि या विधानाचा कडाडून विरोध केला होता… आणि ते योग्यच होते. मुलीचा पित्याच्या प्रेमळ स्पर्शावर हक्क आहे आणि पित्याचाही! स्पर्श मनुष्याच्या भावनिक विश्वात अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्या स्पर्शाचा उद्देश एकच नसतो, शुद्धही असतो. तथापि, त्या व्याख्यातीचे वय लक्षात घेता, तिचे बालपण याच बंधनांत गेले होते, तेच संस्कार झाले होते, हेही लक्षात घ्यावे लागेल.
हेही वाचा – जापनीज वाइफ… अजब प्रेम की गजब कहानी!
आजच्या मुलीने आपल्या वडिलांबद्दल लिहिले तर काय लिहिल? यापेक्षा किती वेगळं असेल? सगळंच गोड नसेल, कडूही असेल… पण नाते अधिक मोकळे, प्रगल्भ झाले आहे, हे जाणवेल असे वाटते. आपण अधिक मोकळ्या मनाने या नात्याकडे पाहत आहोत हेही जाणवेल. कथा कादंबऱ्यांत या बदललेल्या नात्याची नोंद झालेली दिसते. ‘अहो बाबा’ ते ‘ए बाबा’ हा बदल घराघरात झाला आहे.
मी माझ्या बाबांबद्दल काय लिहिले असते? असाही विचार मनात आला आणि खरं सांगू, तर गळा दाटून आला. त्यांना मी ‘तुमच्यावर खूप प्रेम करते’ हे सांगायचे राहून गेले ही खंत आजही उराशी बाळगून आहे. मी असं म्हटलं असतं तर, त्यांनी माझ्याकडे संशयाने पाहिलं असतं, हेही खरंच! माझी वाचनाची आवड त्यांच्यामुळेच. वाचनाची आबाळ तर होत नाहीये ना? असा प्रश्न त्यांनी मला एकदा विचारला होता.
आणि त्यांनी माझ्याबद्दल काय लिहिलं असतं? बाप रे… नको… विचारच नको! झाकली मूठच बरी. पुस्तक वाचताना हा विचार जसा माझ्या मनात आला तसा वाचकाच्या मनात येणारच! हे नातंच तसं आहे. पुस्तकात अनेक चमकदार वाक्य आहेत, जी मनात घोळत राहतात. सर्व लेकींनी आणि वडिलांनी वाचायला हवंच, असे हे पुस्तक.


