दर्शन कुलकर्णी
- आज, दिनांक : 21 जानेवारी 2026; वार : बुधवार
- भारतीय सौर : 01 माघ शके 1947; तिथि : तृतीया 26:47; नक्षत्र : धनिष्ठा 13:57
- योग : व्यतिपात 18:57; करण : तैतिल 14:47
- सूर्य : मकर; चंद्र : कुंभ; सूर्योदय : 07:14; सूर्यास्त : 18:23
- पक्ष : शुक्ल; ऋतू : शिशिर; अयन : उत्तरायण
- संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127
वेद कन्सल्टन्सी / 9987433660
आजचे राशीभविष्य
मेष – आजचा दिवस शुभ असेल. कौटुंबिक जीवन शांती आणि आनंदाने भरलेले असेल. जोडीदाराकडून एखाद्या उपक्रमासाठी उत्तम पाठबळ मिळेल. खूप दिवसांनी जुन्या मित्रांच्या भेटी होण्याचा योग आहे, त्यानिमित्त आठवणींना उजाळा मिळेल. मोठ्या भावंडांकडून एखाद्या निर्णयाबाबत तुम्हाला पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल.
वृषभ – आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक बाबींबद्दल जास्त वादविवाद टाळा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात.
मिथुन – ऑफिस राजकारणापासून दूर रहा. करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. काही जातकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. दीर्घकालीन समस्या सोडवता येतील. कायदेशीर वाद मिटतील. पती-पत्नीच्या नात्यातील गैरसमज दूर करा. पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
कर्क – आजचा दिवस शुभ राहील. राजकीय सन्मान, पद आणि प्रतिष्ठेत वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. एखादा चांगला करार मिळू शकतो. कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल.
सिंह – सामाजिक कार्यात आवड वाढेल. ध्येयपूर्तीचा आनंद मिळेल. मात्र कोणीतरी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करू शकते. आर्थिक व्यवहार सुज्ञपणे व्यवस्थापित करा. आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवा. यामुळे कौटुंबिक समस्या सोडवण्यास मदत होईल.
कन्या – आत्मविश्वासाने आव्हानांना तोंड द्या. वाद सोडवण्यासाठी मोकळेपणाने चर्चा करा, घाईघाईने निर्णय घेणे टाळा. उत्पन्नाचे नवीन स्रोत उदयास येतील. ऊर्जा आणि आत्मविश्वासात वाढ होईल. धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. आज मानसिक शांती मिळेल.
तुळ – आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला असेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कोणत्याही आर्थिक समस्या आज सोडवल्या जाऊ शकतात. काही नवीन संपर्क होतील, जे फायदेशीर ठरतील. कौटुंबिक पार्टी आयोजित केली जाऊ शकते, ज्यामुळे कुटुंबात आनंद वाढेल.
वृश्चिक – आर्थिक स्थैर्य राहील. जुन्या गुंतवणुकीमुळे आर्थिक फायदा होईल. मोठ्या प्रमाणात पैसे उधार देण्याचे टाळा. कारण ते परत मिळविण्यात अडचणी येऊ शकतात. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. घराचे नूतनीकरण करण्याची किंवा नवीन मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखू शकता.
हेही वाचा – आभास… की वास्तव?
धनु – करिअरमध्ये मोठे यश मिळेल. आर्थिक बाबींबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्या. आवश्यक असल्यास, तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास अजिबात संकोच करू नका. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळा. यामुळे विनाकारण ताण वाढू शकतो.
मकर – व्यवसायाचा विस्तार होईल. केवळ कामावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कामामुळे इच्छित परिणाम मिळतील. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. भावंडांना किंवा जवळच्या मित्राला आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते, विचारपूर्वक निर्णय घ्या. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
कुंभ – आजचा दिवस संमिश्र परिणाम घेऊन येईल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवावा लागू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येतील. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्यात सुधारणा होईल.
मीन – आज आरोग्याची काळजी घ्या. काही कारणांनी आज तुम्हाला ताण जाणवू शकतो. कुटुंब आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवा. तुमच्या व्यावसायिक जीवनात तुम्हाला नेटवर्किंगच्या अनेक संधी मिळतील. करिअरमधील अडथळे दूर होतील. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
दिनविशेष
मराठी कवी, कादंबरीकार आणि निबंधकार शरच्चंद्र मुक्तिबोध
टीम अवांतर
मराठीतील प्रसिद्ध कवी, कादंबरीकार आणि निबंधकार शरच्चंद्र मुक्तिबोध यांचा जन्म 21 जानेवारी 1921 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. नवी मळवाट आणि यात्रिक हे मुक्तिबोधांचे दोन काव्यसंग्रह असून क्षिप्रा, सरहद आणि जन हे वोळतु जेथे या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या निबंधसाहित्यात काही निबंध, जीवन आणि साहित्य तसेच सृष्टी, सौंदर्य आणि, साहित्यमूल्य या ग्रंथांचा समावेश होतो.
मानवी जीवन हे यांत्रिक, निर्जीव आणि निष्फळ आहे असा नैराश्यपूर्ण आशय मर्ढेकरी कविता अवतरल्यानंतर मराठी कवितेतून उमटू लागला असताना मुक्तिबोधांनी युयुत्सू आणि आशावादी कविता लिहिली. नवी मळवाट या आपल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रस्तावनांतून (पहिल्या आवृत्तीची आणि 1964 मधील दुसऱ्या आवृत्तीची) निराशावादाचे त्यांनी सैद्धांतिक पातळीवरून खंडन केले. मार्क्सवादावरची श्रद्धा त्यांच्या दोन्ही कवितासंग्रहांमागील एक महत्त्वाची प्रेरणा होती. नवी मळवाट या काव्यसंग्रहास विदर्भ साहित्यसंमेलनाचे पारितोषिक मिळाले. तर यात्रिक या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले.
हेही वाचा – Bookshelf : हसवता हसवता समाजाची कुरूप बाजू दाखविणारी ‘रामनगरी’!
आपल्या कादंबऱ्यांमधूनही मुक्तिबोधांनी सामाजिक दृष्टीचा प्रत्यय दिला आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे सुप्त शक्तींचा एक पिंड असून समाजात राहिल्यामुळे तिला बरेवाईट व्यक्तित्व प्राप्त होत असते, अशी भूमिका घेतली. त्याच आधारे त्यांनी आपल्या कादंबऱ्यांमधील व्यक्तींच्या सुखदुःखांचे चित्रण करीत त्यांच्या भोवतालच्या परिस्थितीलाही रूप देण्याचा प्रयत्न केला.
मार्क्सवाद ही मुक्तिबोधांच्या समीक्षेमागचीही महत्त्वाची प्रेरणा असली, तरी ते मार्क्सवादाच्या चौकटीत अडकून पडले नाहीत. निर्मितिप्रक्रियेचा विचार करताना त्यांनी सामाजिकतेला विशेष महत्त्व दिले. तसेच ‘रस’ आणि ‘रूप’ ही दोन तत्त्वे बाजूला ठेवून त्यांनी ‘मानुषता’ (मानवी अस्तित्वाविषयी आणि त्यातील मूलभूततेविषयी विधान करणारी साहित्य संकल्पना) या तत्त्वाचा ललितकृतीचे घटनतत्त्व म्हणून पुरस्कार केला. त्यांच्या दृष्टीने समता, स्वातंत्र आणि बंधुता ही मानुषतेचीच कालिक तत्त्वरूपे होती. नागपूर येथे 2 नोव्हेंबर 1984 रोजी त्यांचे निधन झाले.


